मोदीजी, गेट वेल सून !
शाळकरी पोरांच्या खेळामध्ये एखाद्याला कुणी चोर चोर म्हणून चिडवत असतील तर सततच्या चिडवण्याने वैतागून तो पोरगा कधीतरी चिडवणाराच्या अंगावर जातो आणि तुझा बाप चोर, तुझी आई चोर, तुझं खानदान चोर.... असं म्हणतो. पोरांच्या खेळात ते चिडवणं आणि चिडणं दोन्ही गोष्टी गांभीर्यानं घेण्यासारख्या नसतात. कारण ते सगळंच पोरवयीन असतं. परंतु मोठ्यांमध्ये तसं नसतं. म्हणून तर मोठी माणसं छोट्यांसारखी वागायला लागली की, काय पोरखेळ चालवलवाय, असं म्हटलं जातं. भारतीय राजकारणाच्या सध्याच्या अवस्थेकडं बघितलं तर मोठ्यामोठ्या नेत्यांनी पोरखेळ बरा वाटावा असा खेळ मांडलेला दिसून येतं. त्याची पातळी इतकी घसरलीय की, त्याबद्दल दोष त्या नेत्यांन द्यावा, त्यांचे तुणतुणे वाजवणा-या वृत्तवाहिन्यांना द्यावा, की या पोरखेळाला संरक्षण देणा-या निवडणूक आयोगाला द्यावा हे समजत नाही. सगळीकडच्या सगळ्यांनी घसरत घसरत नीचतमहून नीचतम पातळी गाठली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या विधानाने अगदी तळ गाठला आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. टीका करता करता ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर घसरले. देशाच्या राजकारणातल्या उच्च पदावरील व्यक्तिची आजवरची ही सर्वाधिक घसरण असावी. मोदी म्हणाले, "आपके पिताजी को आपके राग दरबारियों ने मिस्टर क्लीन बना दिया था. गाजे-बाजे के साथ मिस्टर क्लीन मिस्टर क्लीन चला था. लेकिन देखते ही देखते भ्रष्टाचारी नंबर वन के रूप में उनका जीवनकाल समाप्त हो गया." नरेंद्र मोदी घराणेशाहीवर टीका करतात. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात. इंदिरा गांधींसारखं दबंग नेता होण्याचं त्यांचं स्वप्नं असल्यामुळं इंदिराजींच्या वाटेला ते फारसे जात नाहीत. परंतु (सर्वोच्च न्यायालयानं खरोखर क्लीनचिट दिलेल्या) बोफोर्स प्रकरणाचा संदर्भ घेऊन राजीव गांधींवर टीका करतात. सोनिया गांधींवर टीका करतात. राहुल गांधी तर त्यांच्यासमोर मैदानातच असल्यामुळं त्यांच्यावर टीका स्वाभाविक आहे. परंतु राहुल गांधी यांचा राग येतो म्हणून त्यांच्या वडिलांना शिव्या देणं हे पोरखेळातही सभ्यतेचं मानलं जात नाही, स्वाभावकच देशाच्या राजकारणात ते कुणी सभ्य मानण्याचं कारण नाही. एक शक्यता आहे. मोदीजी ज्या संस्कारशाळेत घडले तिथली शिकवण कदाचित असू शकते. दिवंगत व्यक्तिंबद्दलही अश्लाघ्य बोलण्याची तिथली परंपरा असावी. आमच्या परिचयाचे एक जोशीकाका आहेत. गेल्याच आठवड्यात भेटले तेव्हा ते सांगत होते. माणसाचं कर्म असेल तसा त्याला मृत्यू येतो. उदाहरणार्थ इंदिरा गांधी, राजीव गांधी चिंधड्या चिंधड्या होऊन मेले. वाजपेयींना कसं शांत, नैसर्गिक मरण आलं वगैरे वगैरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजीव गांधी यांच्यासंदर्भातील भाषा ऐकल्यानंतर जोशीकाकांची आणि मोदींची शाळा एकच असल्याची खात्री पटते. मरण पावलेल्या माणसांबद्दलही किती विकृतपणे विचार केला जातो हे पाहून त्यांचा राग येत नाही, तर त्यांच्याबदद्ल करुणा वाटू लागते. जोशीकाकांसारखे हजारो लोक असतील त्यांनी कसा विचार करावा आणि तो कुठं कसा मांडावा हा त्यांचा त्यांचा प्रश्न. कारण घटनेनं त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. तेच स्वातंत्र्य नरेंद्र मोदी यांनासुद्धा आहे. परंतु नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या पदासाठी आपल्याशिवाय कुणीही पात्र नाही, असं त्यांचं स्वतःचं मत आहे. त्याचमुळं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहणारे बाकीचे नेते त्यांना सत्तालोभी, मिलावटी वाटतात. केवळ आपल्या हातात देश सुरक्षित राहू शकतो, हे ओरडून ओरडून सांगण्याचा ते प्रयत्न करताहेत. गंमत म्हणजे एकीकडे सांगताहेत की देश माझ्या हातात सुरक्षित आहे. त्याचवेळी काहीलोक मला मारायला टपले असल्याचा प्रचार करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवज्योत सिद्धूसारखा वाचाळ उपटसुंभ काहीतरी भंपकासारखे बोलतो की, त्यांना तेवढेच निमित्त मिळते आणि काँग्रेसवाले माझ्या मरणाचं स्वप्नं पाहताहेत, असा कांगावा करायला लागतात. मोदीजी आणखी दोन फे-यांपर्यंत किती आणि कुठवर घसरतात, हे पाहावं लागणार आहे. कारण पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या नावानं आनंद आहे. नवी आश्वासनं द्यावीत तर आधीचं काहीच झालेलं नाही. त्यामुळं पाकिस्तानचं नाव घेऊन सतत पाकिस्तानची भीती घालून स्वतःच्या शौर्याचे पोवाडे स्वतःच गात आहेत. सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला, आत घुसून मारले म्हणत म्हणत आता, मी आत घुसून मारले, असं म्हणण्यापर्यंत त्यांची प्रगती झालीय. सुरुवातीला निवडणूक आयोग आणि वृत्तवाहिन्यांचा उल्लेख केलाय. निवडणूक आयोगाच्या क्लीनचिट आपल्या समोरच आहेत. वृत्तवाहिन्यांच्या पक्षपातीपणाबद्दल लिहायचं तर खूप लिहावं लागेल. परंतु वानगीदाखल एक उदाहरण देतो. चौकीदार चोर आहे, हे सुप्रीम कोर्टानंही मान्य केलंय... असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्याविरोधात भाजपचे लोक सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टानं त्यांना नोटीस काढली आणि त्यांना माफी मागावी लागली. एखादा-दुसरा अपवाद वगळता बहुतांश वृत्तवाहिन्यांनी त्याची बातमी अशी चालवली की, चौकीदार चोर है बद्दल राहुल गांधी यांची सुप्रीम कोर्टात माफी. हा सरळसरळ बुद्धीभेद आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. तो जाणूनबुजून करण्यात येत होता. चौकीदार चोर है या घोषणेशी सुप्रीम कोर्टाचं नाव जोडल्याबद्दल माफी मागितली, ही वस्तुस्थिती असताना वृत्तवाहिन्यांनी खोटी बातमी चालवली. राहुल गांधी यांना स्वतः खुलासा करावा लागला, की चौकीदार चौर है..ही आमची प्रचाराची मोहीम आहे. ती मागे घेण्याचा प्रश्नच नाही. त्या घोषणेशी सुप्रीम कोर्टाचे नाव जोडल्याबद्दल मी माफी मागितलीय. अर्थात असा खुलासा करावा लागण्याची गरज नव्हती. परंतु वृत्तवाहिन्यांकडून दिल्या गेलेल्या हेतूपुरस्पर चुकीच्या बातमीमुळे त्यांना तो करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त राष्ट्रवादाचा एवढा टेंभा मिरवताहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी टोळ्या इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा अशा घोषणा देत अल्पसंख्यांकांना त्रास देत आहेत. परंतु नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वंदे मातरमच्या घोषणेला बिहारमध्ये नीतिश कुमार यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांचे ते काही वाकडे करू शकत नाहीत. परिणाम असा झाला की नीतिश कुमार यांच्यासोबत झालेल्या पुढच्या सभेत मोदी यांनी वंदे मातरमची घोषणाच वगळून टाकली. गरीब घावले की चेपायचे, चिरडायचे आणि नीतिश कुमार यांच्यासारख्या दबंगासमोर नांगी टाकायची, यावरून छप्पन इंचाच्या छातीचे खरे माप समोर येते आहे. निवडणुकीच्या निकालाला दोन आठवडे आणि वरती काही दिवस राहिले आहेत. निवडणुकीचा निकाल काहीही लागेल. परंतु प्रचारकाळातले नरेंद्र मोदींचे एकूण वर्तन पाहिल्यानंतर काळजी वाटायला लागते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही मोदी-शहा असेच अस्वस्थ, आक्रमक बनले होते. तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, मोदीजी, हम तुम्हे प्यार से हराना आये है... आताही मोदींनी राजीव गांधी यांच्यासंदर्भात अश्लाघ्य विधान केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना दिलेले उत्तर दोन संस्कृतींमधला फरक दर्शवणारे आहे. राहुलनी म्हटलंय, "मोदी जी, युद्ध समाप्त हो चुका है. आपके कर्म आपका इंतज़ार कर रहे हैं. खुद को लेकर अपनी सोच को मेरे पिता पर डालने से आप बच नहीं पाएंगे. प्यार और जोरदार झप्पी. राहुल." राहुलना म्हणायचे ते त्यांनी म्हटले. आपण फारतर एवढेच म्हणू शकतो, मोदीजी, गेट वेल सून... लवकर बरे व्हा! @@@ (विजय चोरमारे, जेष्ठ पत्रकार, कोल्हापूर) @@@
Leave a comment